नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकर्यांना देण्यात आलेले दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. ही बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकर्यांना प्रतिएकर जमिनीप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
ही रक्कम शेतकर्यांना तीन टप्प्यात मिळणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात अनुदान म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र, सहा टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आणि सातव्या टप्प्याचे मतदान शिल्लक असताना हे 2 हजार रुपये खात्यातून काढून घेण्यात आल्याच्या तक्रारी उत्तर प्रदेशातील शेतकर्यांनी केल्या आहेत. मुजफ्फरपूरमधील जनपद, फिरोजाबाद भागातून अशा तक्रारी आल्या आहेत. दीड महिन्यापूर्वी आपल्या बँक खात्यावर 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला होता. मात्र आता बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो तर खात्यात रक्कम नसल्याचे समजले, असे फिरोजाबाद येथील शेतकरी निरोत्तम सिंह यांनी सांगितले.